महाराणी येसूबाई, ताराबाई, छत्रपती शाहू महाराज समाधीसह किल्ले अजिंक्यताराचे होणार संवर्धन   

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दाखवला हिरवा कंदील

सातारा, (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी राजधानी सातार्‍यातील किल्ले अजिंक्यताराचे जतन, संवर्धन आणि परिसर सुशोभीकरण करणे, पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा करणे तसेच संगम माहुली येथील महाराणी येसूबाई, ताराबाई, छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि संगम माहुलीचा संपूर्ण परिसर विकसित करणे या कामांना उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या कामाचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सरकाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहे. त्यामुळे किल्ले अजिंक्यतारा आणि संगम माहुली परिसराचा लवकरच कायापालट होणार आहे. 
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (दृश्यप्रणालीद्वारे) अध्यक्षतेखाली व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक झाली. 
 
बैठकीत संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, येसूबाई राणीसाहेब यांच्या समाधीस्थळांचा जीर्णोद्धार, विकास करणे, तसेच अस्तित्वातील पहिले शाहू महाराज यांच्या समाधीचा विकास करणे, याठिकाणी माहिती फलक लावणे, परिसरात अस्तित्वात असणार्‍या अन्य काही समाधींचे जतन आणि संवर्धन करणे, राज घराण्यातील व्यक्तींसाठीच्या अंत्यसंस्काराच्या जागेचा विकास, नदीकाठी घाटाचे विस्तारीकरण, दशक्रिया विधी जागा घाटावरून दक्षिण बाजूस स्थलांतरित करणे, पूर्वकालीन झुलत्या पादचारी पुलाचे नवनिर्माण करणे, काशी विश्वेश्वर, रामेश्वर आणि संगमेश्वर या मंदिरांचे जतन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

Related Articles